Chaupher News
गेल्या काही महिन्यांत प्रचंड दरउसळीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकाचे चित्र बदलणाऱ्या कांद्याची आवक आता प्रचंड वाढली असून सर्वच बाजार समित्यांमध्ये मुबलक कांदा दाखल होत आहे. गरजेहून अतिरिक्त कांदा असूनही तो निर्यातबंदीमुळे अडकला आहे. बाजारातील दर स्थिर राहण्यासाठी आंध्र प्रदेशप्रमाणे कांद्याची निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून तीव्र झाली आहे.
डिसेंबर महिन्यात ‘भाव’ खाल्लेल्या नवीन गरवी कांद्याची आवक बाजारात वाढली असून राज्यातील प्रत्येक प्रमुख बाजार समितीमध्ये दररोज सुमारे २०० ट्रक कांदा पाठविला जात आहे. दोन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात १० किलो कांद्याला १४०० रुपये असा उच्चांकी भाव मिळाला होता. त्यानंतर नवीन कांद्याचे उत्पादन हाती आल्याने कांद्याची मोठी आवक गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात सुरू झाली असून कांद्याचे दर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीस परवानगी देण्याची मागणी केली आहे.