चौफेर न्यूज – अनलॉक 4 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या तब्बल 64 लाख 59 हजार 388 विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद सरल शिक्षण संगणक प्रणालीत करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळा आणि ज्युनियर काॅलेजला दिल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद असल्याने तहसील कार्यालय, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची नोंद करण्याची पर्यायी व्यवस्था करावी असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
31 मार्च 2021 पूर्वी सर्व शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक नोंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची असून मुंबई विभागात महापालिका शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इतर विभागात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाणार आहे. आधारनोंदणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.
- राज्यात 1 लाख 10 हजार 315 शाळा; तर 2 कोटी 25 लाख 60 हजार 578 विद्यार्थी.
- यातील 64 लाख 59 हजार 388 विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची सरल प्रणालीत नोंद नाही.
- काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी (एकच आधार क्रमांक पण दोन वेगळे विद्यार्थी)
- काही अस्तित्वात नसलेल्या आधार क्रमांकांची सरलमध्ये नोंद.
शिक्षक संघटनांचा मात्र विरोध
विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावत कामाला विविध शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांमुळे विद्यार्थी पालकांसह शिक्षकांचा जीवही धोक्यात घालण्यासारखे आहे. लाँकडाऊनमध्ये तसेच कंटेनमेंट झोनमधील शाळा आधार नोंदणीचे काम कसे करणार असा सवाल उपस्थित करून शिक्षण विभागाने हे परिपञक मागे घ्यावे, अशी मागणी काही शिक्षकांनी केली आहे.