चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता 23 मे रोजी होईल. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
25 एप्रिल ऐवजी 23मे ला होणार परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 एप्रिल दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्यानं शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती.
अर्ज सादर करण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ
शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी यापूर्वी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही मुदत 10 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
6 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार
राज्यातील 6 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. आता बदलेल्या वेळापत्रकाप्रमाणं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा 23 मे रोजी आयोजित करणार आहे.
10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार
नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.