चौफेर न्यूज – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. बारावीच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत आम्ही सर्वसमावेशक निर्णयाजवळ पोहोचलो आहोत. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनामधील परीक्षांविषयी शंका दूर होतील, असं देखील रमेश पोखरियाल म्हणाले. राज्य सरकारांनी आणि परीक्षा बोर्डांनी त्यांची सविस्तर भूमिका 25 मे पर्यंत कळवावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं. तर, उच्च स्तरीय बैठकीबाबत विविध राज्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले ते पाहणं देखील महत्वाचं आहे.
राज्यांकडून सविस्तर सूचना मागवल्या
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय बैठकीत बारावीच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्य सरकार आणि राज्य परीक्षा बोर्डांकडून अभिप्राय मागवला आहे. राज्यांनी त्यांचा बारावी परीक्षा संदर्भातील सविस्तर अहवाल त्यांची मतं 25 मे पर्यंत मला पाठवावेत, असं आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.
नवी दिल्लीच्या आणि केरळच्या शिक्षणमंत्र्यांची मागणी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करा
नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री यांनी उच्च स्तरीय बैठकीत बारावीच्या परीक्षा घेण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरण करुन घ्यावं, अशी मागणी केली. लसीकरणासाठी केंद्रानं फायजर कंपनीसोबत बोलावं. असा प्रस्ताव देखील मनीष सिसोदिया यांनी मांडला. केरळ सरकारनं देखील विद्यार्थ्यांचं लसीकरण करावं अशी भूमिका मांडली.
महाराष्ट्राची भूमिका काय?
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या संदर्भात चर्चा करु. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका मांडल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या बोर्डाचे 14 लाख विद्यार्थी
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला माहिती आहे की, जसं सांगितलं जातेय की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचं वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे.तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सुरक्षित वातावरणात केली पाहिजे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
कर्नाटक, तामिळनाडू राज्य परीक्षा घेण्याच्या बाजूनं
कर्नाटक आणि तामिळनाडूच्या शिक्षणमंत्र्यांनी बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरमधील महत्वाची गोष्ट असल्याचं सांगतिलं. कर्नाटकचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार बारावीची परीक्षा आयोजित करण्याबाबत दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करु असं सांगितलं. तर दुसरीकडे, तामिळनाडूचे शिक्षणमंत्री अंबिल महेश पोय्यामोझी यांनी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे.
ओडिशाच्या राज्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
ओडिशाचे शिक्षणमंत्री समीर रंजन दास यांनी देखील कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर परीक्षा आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे. सध्या यास चक्रीवादळ येणार असल्यानं त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं देखील त्यांनी कळवलं.
सीबीएसईचं मत काय?
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मुख्य विषयांची परीक्षा घेऊ शकते. तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार सीबीएसई परीक्षेचा वेळ कमी करुन बहूपर्यायी स्वरुपात परीक्षेचं आयोजन करु शकते. यामुळे परीक्षेच्या पेपरचा वेळ देखील कमी होणार आहे. बहूपर्यायी म्हणजेत वस्तूनिष्ठ पद्धतींनं परीक्षा घेतल्यास परीक्षेचा वेळ तीन तासांवरुन दीड तासांवर येईल.