चौफेर न्यूज – शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाचा कार्यक्रम सुरू झाला असून ऐन पावसात मुंबईबाहेर राहणाऱया असंख्य शिक्षकांना मूल्यमापनाच्या कामकाजासाठी शाळेत पोहोचण्यास मोठय़ा दिव्यातून जावे लागत आहे.
मुंबई आणि परिसरात असलेल्या उच्च माध्यमिक शाळांतील 70 टक्क्यांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मुंबईबाहेर कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा, अंबरनाथ, टिटवाळा, शहाड, वसई, विरार आदी परिसरात राहतात. या शिक्षकांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा न मिळाल्याने काहीजण शाळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवशी अंतर्गत मूल्यमापन कामकाजाचे तीनतेरा वाजले. रेल्वे स्थानकावर आपल्याला तिकीट न मिळाल्याने परत जावे लागत असल्याचे सांगत अनेक शिक्षकांनी यासाठी रेल्वे स्थानकावरील तिकीट घरासमोरच सेल्फी काढून याविषयीची माहिती आपल्या शाळा आणि संघटनांना पोहचवली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक शिक्षक संघटनांनी राज्य सरकारकडे दहावीचे कामकाज करणाऱया शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे, मात्र अद्याप या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. मूल्यमापनाचे काम थांबले असून त्याला जबाबदार कोण, असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.
ऑनलाइन शिक्षण सुरू करावे
येत्या 15 जूनपासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू होत असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी शासनाने आवश्यक आदेश काढावेत व शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थितीची सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना केली आहे.