चौफेर न्यूज – राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने 12 वी परीक्षेचा निकाल (result) जाहीर करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील एकूण निकाल सुमारे 99 टक्क्यांच्या वर लागला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना पदवीच्या प्रवेशासाठी एक पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा होती. परंतु,आता कुठलीही सामाईक प्रवेश परीक्षा (CET ) घेतली जाणार नसून 12 वीच्या निकालांच्या आधारावरच पदवीचे प्रवेश होणार असल्याचं राज्य शासनाने (Maharashtra Government) जाहीर केलं आहे. या निर्णयावरून विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला आहे. याबाबत माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
उदय सामंत म्हणाले, ‘कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. 12 वी बोर्डाच्या निकालाच्या आधारे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या विभागातील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तुकड्यांची अथवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर 31 तारखेपूर्वी आमच्याकडे त्याबाबत प्रस्ताव सादर करावेत. मात्र, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठानं घ्यायला हवी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असं सामंत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, यंदाचा लागलेला 12 वी बोर्डाचा निकाल 10 वी, 11 वीमध्ये मिळालेले सरासरी गुण आणि 12 वीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला. निकालाची टक्केवारी जवळपास साडेआठ टक्क्य़ांनी वाढली असून, 13 लाख 14 हजार 965 नियमित विद्यार्थी उच्चशिक्षण संस्थांच्या उंबऱ्यावर प्रवेशासाठी दाखल झाले आहेत. यंदा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच पुनर्परीक्षार्थीचे उत्तीर्णतेचे प्रमाणही वाढले असून, 63 हजार 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर साधारण 26 हजार 300 खासगीरित्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.