मुंबई : राज्यात अखेर महाशिव आघाडीचं सरकार अस्तित्वात येणार असल्याचं आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्पष्ट झालं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येवुन सरकार स्थापन करणार आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेवुन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सर्वप्रथम भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र, मुख्यमंत्री पदावर अडुन बसलेली शिवसेना सोबत नसल्यानं भाजपनं सरकार स्थापन करू शकत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. शिवसेनेनं ते निमंत्रण स्विकारलं असून आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार म्हणजेच महाशिव आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे मात्र तो बाहेरून दिला की सत्तेत सामील होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. काही तासातचं काँग्रेसची भुमिका स्पष्ट होणार आहे.