आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस बुधवारी (ता. २०) गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरवात झाली. कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत कार्तिकी वारी सोहळा चालणार असून, मुख्य कार्तिकी एकादशी शनिवारी (ता. २३) आणि माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सोमवारी (ता. २५) असणार आहे. कार्तिकी वारीत हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून वारकरी दाखल झाले आहेत. दरम्यान पहाटे पवमान अभिषेक दुधारती झाल्यानंतर महापूजा झाली.
दरम्यान, सकाळी सात ते नऊ या वेळेत देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पुजनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळखर, प्रमुख विश्वस्त विकास ढगे, डाॅ. अभय टिळक, अजित कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.