Chaupher News
भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित शर्माने ११९ तर कर्णधार विराट कोहलीने ८९ धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात कॅप्टन कोहलीने दमदार खेळीसह एक महत्त्वाचा विक्रम मोडला. त्याने केलेल्या ८९ धावांच्या कामगिरीच्या जोरावर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला. हा विक्रम आधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे होता. त्याच्या नावे कर्णधार म्हणून ११ हजार २०७ धावा आहेत. त्यापुढे जात विराटने ११ हजार २०८ धावा केल्या. या यादीत मोहम्मद अझरूद्दीन तिसरा तर सौरव गांगुली चौथा आहे.