चौफेर न्यूज – राज्यातील विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित समस्या आहे. कोरोना काळात अकरावी प्रवेश मूल्यांकन पद्धती, पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश मूल्यांकन पद्धतीबद्दलची अस्पष्ट भूमिका, परीक्षा शुल्क माफी, त्याशिवाय शाळा आणि महाविद्यालयात फी मध्ये सूट मिळवण्याबाबत शहापूरमधील भाजप युवामोर्चाचे विद्यार्थी संपर्क प्रमुख जय शेखावत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली.
यावेळी त्यांनी राज्यपालांसमोर राज्यातील विद्यार्थ्यांच्याअनेक प्रलंबित समस्यांविषयी चर्चा केली. राज्यात इयत्ता अकरावी प्रवेश मूल्यांकन पद्धत, पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश मूल्यांकन पद्धती बद्दलची अस्पष्ट भूमिका, परीक्षा शुल्क परत देणे किंवा माफ करणे, शाळा आणि महाविद्यालये यांच्या फीमध्ये सूट मिळण्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे विविध मागण्याही केल्या.
भाजप विद्यार्थी संघटनेच्या मागण्या काय?
1.
महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यालय आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे.
2. तसेच विद्यार्थ्यांचे घेतलेले परीक्षा शुल्क परत करावे.
3. कोविड-१९ मुळे जे विद्यार्थी थेट प्रभावित झाले आहेत, त्या विद्यार्थांना आर्थिक सहाय्य करण्याचे धोरण जाहीर करावे.
4. जे विद्यार्थी फी भरण्याच्या स्थितीमध्ये नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्वरित सूट देऊन त्यांची फी टप्याटप्याने भरण्याची सुविधा द्यावी.
5. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ते महाविद्याल्यातील सुविधा वापरत नाहीत. त्यामुळे त्यांचे अधिकचे शुल्क हे कमी करण्यात यावे.
6. विद्यार्थ्यांना कोविड-19 प्रतिबंधात्मक लस हे त्या विद्यार्थ्यांच्या शिकत असलेल्या शाळा, महाविद्यालयातच देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
7. विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी करता दूरदृष्टी ठेऊन शैक्षणिक धोरण जाहीर करावे.
विद्यार्थी हा राष्ट्राचा कणा आहे, त्यांचे भविष्य म्हणजे देशाचे भविष्य आहे. या दृष्टीकोनातून विद्यार्थी हिताच्या मागण्या मान्य व्हाव्यात. यासाठी सर्व विद्यार्थी आग्रही आहोत, असे भाजप युवमोर्चाचे विद्यार्थी संपर्क प्रमुख जय शेखावत म्हणाले.