मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद एकमेकांवर आरोप करत आहेत. चित्रा वाघ उर्फी जावेदच्या विरोधात पुन्हा एकदा बोलताना दिसत आहेत. यावेळी महिला आयोगालाही त्यांनी सवाल केला आहे. उर्फी जावेदच्या उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
महिला आयोगाची फक्त भाषा नको आहे तर कृती हवी आहे. भर रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? उर्फी जावेद खूप बीभत्सपणे रस्त्यावर फिरते आहे. महिला आयोगाने याचा जाब का विचारला नाही ? माझा विरोध उर्फी या व्यक्तीला नाही. तर तिच्या उघड्यानागड्या, घाणेरड्या, ओंगळवाण्या आणि किळसवाण्या विकृतीला आहे. ज्या पद्धतीने महिला आयोगाने भूमिका मांडली त्याचा अर्थ असं उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? कायदा कायद्याचं काम करेल. आमचं शिंदे फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात आहे. सरकार सरकारचं काम करणार आहेच. मात्र महिला आयोगाला याबाबत काही वाटतं की नाही? अशा पद्धतीचा नंगानाच हा महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. उघडंनागडं सार्वजनिक ठिकाणी फिरणं ही आमची संस्कृती नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
उर्फी जावेद ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते. एवढंच नाही तर तिचे कपडे हे अंगप्रदर्शन करणारे असतात. तिच्या अशा प्रकारच्या कपड्यांवर आणि अर्धनग्न फिरण्यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. त्यासाठी त्यांनी तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओला उर्फी जावेदनेही उत्तर दिलं होतं. मात्र आता चित्रा वाघ यांनी या प्रकरणात महिला आयोगाने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. महिला आयोग या प्रकरणात शांत का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.