मुंबई : दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्य सुरक्षा महामंडळ, एटीएस प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर आता देवेन भारती यांची मुंबईचे नवे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते पहिले विशेष पोलीस आयुक्त ठरले आहेत.
दरम्यान, या पदावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अनेक ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. या ज्येष्ठ अधिकाऱ्यांपैकी देवेन भारती यांच्या नावाची जोरदार चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू झाली होती. तसेच या नवीन पदासाठी त्यांच्या नावाची वर्णी लागण्याची दाट शक्यताही वर्तविण्यात येत होती. शासनाकडून लवकरच विशेष पोलीस आयुक्तपदाचे आदेश काढण्यात येणार होते. परंतु मुंबई पोलीस दलात या नव्या पदाची काय आवश्यकता भासली असावी, दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे पद निर्माण केले जाणार असल्याचं बोललं जात होतं.
मुंबई पोलीस आयुक्तांचा ताण कमी करण्यासाठी तसेच मुंबईतील वाढती लोकसंख्या त्याचसोबत वाढणारी गुन्हेगारी, वाढत्या राजकीय घडामोडी, मोर्चे, आंदोलने, मेळावे, व्हीआयपी मुव्हमेंट, महिलांची सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर सोबत मुंबईतील वाढती वाहनांची गर्दी हे सर्व पाहता मुंबईला विशेष पोलीस आयुक्तची नेमणूक करण्यात येणार असल्याचे एकीकडे बोलले जात होते.
मुंबई पोलीस दलात पोलीस आयुक्त या पदाव्यतिरिक्त मुंबईत ५ सहपोलीस आयुक्त आहेत. प्रशासन, गुन्हे, कायदा व सुव्यवस्था, आर्थिक गुन्हे शाखा आणि वाहतूक विभाग या पाच जागांवर सहपोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी असून त्यांच्यावर पोलीस आयुक्त हे पद आहे. या पदासाठी देवेन भारती यांच्या नावाला पसंती सरकारकडून देण्यात येत होती. मविआ सरकारच्या काळात भारती यांना राज्यात कुठलीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली नव्हती, मात्र या सरकारच्या काळात त्यांना मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदाची जवाबदारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.
देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. देवेन भारती यांची ‘डॅशिंग’ अधिकारी अशी ओळख आहे. एप्रिल २०१५ मध्ये त्यांची मुंबईच्या सहपोलीस आयुक्तपदी (कायदा आणि सुव्यवस्था) नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर सर्वाधिक काळ सेवा बजावण्याची संधी भारती यांना मिळाली. यादरम्यान भारती यांनी अनेक ‘हाय-प्रोफाइल’ प्रकरणांचा तपास केला. त्यात मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला तसेच पत्रकार जे डे हत्या या प्रमुख घटनांचा समावेश आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेची महाराष्ट्रातील पाळेमुळे खणून काढण्यातही भारती यांचा मोठा वाटा आहे.