चौफेर न्यूज – राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती. तसेच या पाठोपाठ अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर 20 हजार अंगणवाडी सेविकांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना इतरही सुविधा देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी भाडेतत्त्वावर अंगणवाडी भरविल्या जातात. अशा अंगणवाड्यांना अत्यंत तुटपुंजे भाडे देण्यात येते. काही ठिकाणी ३ ते ४ हजार रुपयेच भाडे मिळते. त्यामुळे या अंगणवाड्यांचे भाडे वाढवून देण्याबाबतही सरकार विचार करत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय राज्यातील अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत नवा प्रस्तावांच्या हालचालींना वेग आला असून त्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत आणि इतर भागातील शाळांमधे सुमारे २० हजार खोल्या अंगणवाड्यांसाठी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील अंगणवाड्यांची संख्या वाढणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.