– आळंदी नगरपरिषदेच्या यशाबद्दल केले कौतुक
– आमदार महेश लांडगे यांनी ‘शब्द’ पाळला
आळंदी – आळंदी नगरपरिषदेच्या ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व निर्माण केले. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना या निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेनेच्या बालेकिल्यात ‘कमळ’ फुलावे, यासाठी आमदार लांडगे यांनी जोरदार प्रयत्न केले. त्याला यश मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे यांची गळाभेट घेवून कौतुक केले.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार लांडगे नागरपूर येथे आहेत. दरम्यान, मंगळवारी सकाळी १२ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील १० नगरपरिषदांसाठी सुरु असलेल्या मतमोजणीचे निकाल हाती येत होते. नागपूर येथील विधीमंडळ सभागृहाच्या आवारात केवळ नगरपरिषदांच्या निकालांची चर्चा होती. त्यातच आळंदी नगर परिषदेत भाजपने बाजी मारल्याचे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजले. त्यांनी तात्काळ आमदार महेश लांडगे यांच्याशी चर्चा केली. तसेच, दोघांनी भेट घेवून गळाभेटही केली. तसेच, आमदार लांडगे यांच्यासह आळंदीतील भाजप कार्यकर्ते-पदाधिका-यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
भोसरी येथील गावजत्रा मैदानात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘भोसरी व्हिजन-२०२०’ हे अभियान सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान, श्रीक्षेत्र आळंदी नगरपरिषद भाजपच्या हातात असावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार लांडगे यांना बोलून दाखवली होती. त्यानंतर आमदार लांडगे यांनी आळंदीत ठाण मांडले होते. तालुकाअध्यक्ष अतुल देशमुख आणि काही विश्वासू सहका-यांच्या मदतीने त्यांनी ‘होम टू होम’ प्रचार केला. तसेच, अपक्ष नगरसेवकांनाही पक्षाला पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक केले. त्यामुळे विजय सोपा झाला, अशा भावना यावेळी आमदार लांडगे यांनी व्यक्त केल्या.
खासदार आढळराव यांना धक्का….
गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून आळंदी नगरपरिषद ओळखली जाते. गेल्या १५ वर्षांपासून खासदार आढळराव यांची शिरुर लोकसभेत एकहाती सत्ता आहे. तसेच, स्थानिक आमदार सुरेश गो-हे हेसुद्धा शिवसेनेचे आहेत. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांना ही निवडणूक तशी आव्हानात्मक होती. तरीही भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली या निवडणुकीत भाजपने ‘कमळ’ फुलविले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का बसला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे.