पिंपरी :- पवना सहकारी बँकेची संचालक मंडळ निवडणूक होऊ घातली आहे. आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी आपली बँक आज खऱ्या अर्थाने जुन्या काही संचालक मंडळामुळे अडचणीत आली आहे. पवना बँकेतील गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या एकाधिकारशाहीला संपवून पवना सहकारी बँक वाचविणे आवश्यक आहे. दि.९ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या नवीन संचालक मंडळाच्या निवडणुकीत अनेक वर्षांपासून ठाण मांडलेल्या संचालकांना घरचा रस्ता दाखविणे आवश्यक आहे. जनतेच्या पैशाची लूट थांबविण्यासाठी पवना प्रगती पॅनल ला विजयी करा, असे आवाहन पवना प्रगती पॅनलच्या वतीने पत्रकार परिषदेत आज करण्यात आली होती.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, एकाधिकारशाहीला संपविण्यासाठी, बँकेच्या वाढीसाठी, बँकेचे उज्वल भविष्य साकार करण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून एक नामी संधी चालून आली आहे. बँकेचे संस्थापक आणि जेष्ठनेते माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने ही बँक स्थापन झाली. श्री. लांडगे यांचे सहकार क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. ते आमचे दैवतच आहेत. परंतु आमचा खरा विरोध हा, श्री. लांडगे साहेबांना वेठिस धरून स्वतःचा स्वार्थ व हित जपणाऱ्या त्यांच्या भोवतालच्या इतर संचालकांना आहे. वर्षानुवर्षे हे संचालक बँकेची सत्ता सांभाळत आहेत. त्याला आमचा विरोध असून घराणेशाहीचे जूने पेव फुटले की काय असे वाटते. ही घराणेशाही संपवायची म्हणून आम्ही ७ उमेदवार “पवना प्रगती पॅनेल” च्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहोत.
प्रामुख्याने ५० व्या वर्षात पाऊल ठेवणारी आपली बँक ही प्रगतीपथावर आहे. आज पवना बँकेबरोबर ज्या बँका मागील ५० वर्षांपूर्वी सुरु झाल्या. त्या बँकांचा प्रगतीपथाचा आलेख व पवना बँकेचा प्रगती पथाचा आलेख पहिला तर, बँकेची प्रगती सध्याच्या संगणक युगात संथ गतीने चालू आहे. त्या प्रगतीला गती देण्यासाठी पवना प्रगती पॅनलचे १.अमर अशोक कापसे, २.विलास ज्ञानेश्वर भोईर, ३.दत्तात्रय धोंडिबा दातीर पाटील, ४.दिलीप विठोबा नाणेकर, ५.योगिता संजय कलापुरे, ६.शोभा रमेश वाघेरे, ७.चंद्रकांत बाबुराव कांबळे असे ७ उमेदवार ही संचालक मंडळ निवडणूक लढवित आहोत.
सर्वात महत्वाचे असे की पवना बँकेची ही निवडणूक विद्यमान संचालकांच्या आडमुठे धोरणामुळे लादली गेली, असा आरोप होत आहे. परंतु ज्यावेळी आम्ही १४ उमेदवार एकत्र येऊन पॅनेल बनविण्याच्या प्रयत्नात होतो. त्यावेळी बँकेची निवडणूक ही बिनविरोध करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी आमच्या १४ उमेदवारांपैकी कोणतेही २, ३ नवीन उमेदवार मा. ज्ञानेश्वर लांडगे साहेबांनी घ्यावेत आणि उर्वरित उमेदवार माघार घेतील असे ठरले होते. परंतु खऱ्या अर्थाने मा. लांडगे साहेबांच्या भोवतालच्या व्यक्तींनी आडमुठे पणाची भूमिका घेत हा प्रस्ताव नाकारला.
त्यामुळे बँकेची निवडणूक लागली. वर्षानुवर्षे एकाच घरात उमेदवारी देण्याचा पायंडा सुरु आहे. काही विशिष्ट गावांमधून संचालकांना उमेदवारी दिली जात आहे. निगडी, रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, वाकड, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, सांगावी , दापोडी , बोपखेल, मोशी, तळवडे, चिखली , चऱ्होली ही गावे उमेदवारीपासून वंचीत आहेत. त्यांचे मतदान, त्यांच्या ठेवी , त्यांची खाती चालतात. मग या गावांना उमेदवारी का नाही ? आपली संस्था एकाधिकारापासून व घराणेशाही पासून आणि सभासदांच्या व ठेवीदारांच्या हितासाठी काही नवीन सहकार्यांना घेऊन “पवना प्रगती पनेल”च्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यासाठी आपला पाठींबा आणि आशीर्वाद मिळावा आणि पवना प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना घड्याळ्याच्या चिन्हावर शिक्का मारून बहुमताने विजयी करा, असेही पवना प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी यावेळी नमूद केले.