पुणे :- संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून पिकांना धोका निर्माण होणार आहे. दरम्यान, काल कोकणात रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. रत्नागिरीतील साखरपा परिसरात जोरदार पाऊस झाला आणि दाणादाण उडवून दिली. वादळाने काही घरांवरील पत्रेही उडाले. तर सिंधुदुर्गात जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अनेक भागांत गारपीटही झाली. यामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतक-यांनी पिकाची काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय.
पश्चिम महाराष्ट्रात दोन जिल्ह्यात पाऊस
सातारा शहरासह ग्रामीण भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसाने शहरासह, ग्रामीण भागातील जनतेची चांगलीच तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने पुढले 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांची धावपळ उडाली. उकाड्यापासुन हैराण झालेल्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसानं दाणादण उडवली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात सोसाट्याचा वारा सुटल्यानं, अनेक ठिकाणचे पत्रे उडाले. तसंच वा-यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची गळ झाली. यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या वादळी पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. मार्च महिन्यात अमरावती जिल्ह्यात 4 हजार हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालं होतं. तर आत्ताच्या पावसामुळे अमरावती, वाशिम तसंच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेत. बुलडाणा जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. ब-याच भागांत जोरदार गारा बरसल्या. जिल्ह्यातल्या मोताळा आणि खामगावमध्ये जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे.