Chaupher News
महिला सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत देश प्रगती करु शकत नाही. जगाच्या पाठीवरील प्रत्येक प्रगत देशाने तेव्हाच प्रगती साधली. ज्यावेळी त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजातील दोनही चाके जोडली. केवळ पुरुषांचे नाही. तर, स्त्रियांचे चाक देखील अर्थव्यवस्थेला जोडले. त्यावेळीच अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा दर दुपटीने वाढवू शकतो. त्यातूनच भारत प्रगत होईल, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महिलांनी बचत गटांच्या वस्तूंना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भोसरीतील गावजत्रा मैदानात शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून आयोजित ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे उद्घघाटन आज (गुरुवारी) फडणवीस यांच्या हस्ते झाले. रविवारपर्यंत ही जत्रा सुरु असणार आहे. महापौर उषा ढोरे, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार राहुल कुल, माजी आमदार शरद सोनवणे, पूजा लांडगे, उमा खापरे, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, अमित गोरखे, सभागृह नेते एकनाथ पवार, महेश कुलकर्णी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “भारताला महाशक्तीमध्ये परिवर्तीत करायचे असेल. तर, महिलांना सक्षम करणे आवश्यक आहे. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा दर दुपटीने वाढू शकतो. त्यातूनच भारताला प्रगत करु शकतो. महिला सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष केले. तर, भारत कधीच प्रगती साधू शकणार नाही. महिला सक्षमीकरणाचे प्रमुख्य माध्यम आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे आहे”
“आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता बचत गटांची एक फार मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. 2014 साली राज्यातील केवळ साडेतीन लाख महिलांची कुटुंबे बचतगटाच्या चळवळीशी जोडली होती. आम्ही साडेतीन लाखांवरुन 40 लाख कुटुंबे बचतगटांशी जोडली. त्याच्या माध्यमातून सक्षमीकरण केले. वेगवेगळ्या व्यासपीठावरुन, बाजारातून त्यांना त्यांची वस्तु विक्रीची व्यवस्था करुन दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज महिला बचतगटांना देण्याची योजना तयार केली. त्यातून महिला सक्षमीकरणाचा एक मार्ग तयार झाला”
इंद्रायणीथडी जत्रेतून महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. इंद्रायणीथडीची संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्धार यातून पहायला मिळतो. 800 बचतगटांकरिता वेगवेगळ्याप्रकारचे स्टॉल दिले आहेत. यामध्यातून 16 हजारपेक्षा जास्त महिलांना व्यासपीठ, बाजारपेठ मिळाली आहे, असेही फडणवीस म्हणाले.