Chaupher News
इराणमध्ये कोरोना व्हायरसची लागण मोठयाप्रमाणात होत असून पश्चिम महाराष्ट्रातील ४४ जण अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एक पत्रही लिहिले आहे.
याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, “सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरातील ४४ जण २२ फेब्रुवारीपासून इराणची राजधानी तेहरीन येथे अडकून पडले आहेत. याबाबत कोल्हापूरचे रहिवासी असलेल्या मोमीन यांनी माझ्याशी संपर्क साधला असून मदतीची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील या लोकांच्या सुटकेसाठी आपण पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. यावर पंतप्रधान कार्यालयाने माझ्या पत्राला उत्तर देताना सांगितले की, या लोकांना भारतात परत आणायचे आहे. मात्र, त्यापूर्वी तेहरानमध्येच इराण सरकार एक प्रयोगशाळा उभारून तिथे त्यांची तपासणी करणार आहे, त्यानंतर खास विमानाने त्यांना भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली आहे.