चौफेर न्यूज : राज्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहून पावसाळयाच्या काळात धोका नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आता अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीने हा निर्णय घेतला आहे. मागच्या सत्रातील सरासरी मूल्यमापनावरून ५०% गुण देऊन मूल्यांकन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना ग्रेड दिले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नाहीत अशा विद्यार्थ्यांना अपग्रेडेशनची परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेनंतर ग्रेडपेक्षा जास्त गुण मिळाले तर ते गुण ग्राह्य धरले जातील.
कोरोनामुळे राज्यातील सुमारे ४० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच अंतिम वर्षातील १० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार होती. दरम्यान या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मे मध्ये घेण्याचेही नियोजन होते. पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे परीक्षा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. तितक्यात पाऊसही सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाने परीक्षा घेता येणार नाहीत असे सांगितले आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव यांच्यासोबत इतर जिल्ह्यातही संसर्ग वाढत असल्याने १३ पैकी ११ विद्यापीठाच्या कुलगुरूंनी परीक्षा घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगितले आहे.
हल्लीच रुग्णसंख्येत वाढ होऊन राज्यातील जास्त रुग्णसंख्येच्या यादीमधील १० जिल्ह्यांमध्ये आलेला सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस आणि क्रांतीजोती सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी या परीक्षा घेता येतील असे सांगितले आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील १३ कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली होती. पुणे व सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ऑनलाईन परीक्षा घेता येईल असे सांगितले आहे. तसे सर्वेक्षण आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व चर्चेनंतर उदय सामंत यांनी राज्यस्तरीय समितीला अहवाल देण्यास सांगितले असून आता ३१ मे पर्यंत ते अहवाल देणार असल्याची माहिती मिळाली आहे.