चौफेर न्यूज – ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पालकाने टॅब घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या एका विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली. अभिषेक संत असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीडच्या गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील रहिवासी आहे.
‘गाव खेड्यातील शेतकऱ्यांची सध्याची परस्थिती काय आहे याची सरकारने पाहणी करावी. सरकारने ऊंटावरुन शेळ्या न राखता ऑनलाइन शिक्षण जर द्यायचं असेल तर पहिल्यांदा तर प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारने टॅब उपलब्ध करून द्यावेत,’ अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, पेरणी झाल्यावर टॅब घेऊ देण्यात येईल, असं शेतकरी वडिलांनी सांगितले होते. मात्र हताश झालेल्या मुलाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या संकटात ऑनलाईन शिक्षणाच्या अट्टहासामुळे गरीब – श्रीमंत दरी आणखी गडद होत आहे. याचाच अभिषेक बळी ठरला आहे. यामुळे शिक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन शिक्षण देताना सामान्य वर्गातील विदयार्थ्यांबाबतीत विचार होणे गरजेचे आहे. घरची परिस्थिती पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च शिकायची इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही या विचाराने नैराश्यातून आत्महत्ये चे टोकाचं पाऊल उचलले.