चौफेर न्यूज – भारताच्या स्वातंत्र्यदिनी देशासह संपूर्ण जगाला कोरोनामुक्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकच्या BBV152 या लसीच्या मानवावरील चाचणीसाठी मान्यता देण्यात आली होती.
यानंतर लसीसंदर्भातील सर्व चाचण्या योग्यरित्या पार पडल्या तर 15 ऑगस्टपर्यंत ही लस बाजारात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. जगभरात कोरोनावर इलाज करण्यासाठीच्या लसींचे संशोधन सुरू असून हिंदुस्थानातही या लसीबाबतचे सातत्याने संशोधन सुरू आहे. ही लस ICMR म्हणजेच हिंदुस्थानच्या वैद्यकीय परिषदेने हैदराबाद इथल्या ‘भारत बायोटेक इंटरनॅशनलसोबत मिळून ही लस बनवली आहे.
ही लस संपूर्णपणे स्वदेशी असल्याचे सांगण्यात आले आहे. ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितले की प्रयोगशाळेतील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही लस 15 ऑगस्टला बाजारात आणली जाऊ शकते. या लसीबाबतचे सर्व काम जलदगतीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश ICMR ने या लसीच्या कामात गुंतलेल्या सर्व व्यक्ती आणि संस्थांना दिले आहेत. एका पत्रामध्ये ICMR ने म्हटलंय की या लसीच्या चाचण्या युद्धपातळीवर घेण्यात याव्यात जेणेकरून चाचणी अहवाल 15 ऑगस्टपर्यंत जाहीर केले जाऊ शकतील.