चौफेर न्यूज – केंद्रीय विद्यालय संस्थेने निर्णय घेतला आहे की, सर्व केंद्रीय विद्यालयांत यावेळी इयत्ता 9 वी आणि 11 वी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता पुढील वर्गात प्रमोट करण्यात येईल. देशभरातील सर्व केंद्रीय विद्यालयांचे इयत्ता 9 वी आणि 11 वीत फेल झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना आता परीक्षांची वाट पहावी लागणार नाही. केंद्रीय विद्यालय संस्थेने याबाबत पत्र जारी केले आहे.
सध्या या इयत्तांमध्ये कमाल दोन विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी सप्लीमेंट्री परीक्षा द्यावी लागत होती. यानंतर सप्लीमेंट्रीमध्ये पास झाल्यानंतरच पुढील वर्गात प्रमोट केले जाते. परंतु यावेळेस ही परीक्षा घेतली जाणार नाही.
संस्थेने कोरोना व्हायरस महामारीमुळे देशाभरात लॉकडाऊन आणि शाळा बंद असल्याची स्थिती पाहता हा निर्णय घेतला आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय केवळ या वर्षीसाठी घेण्यात आला आहे. केंद्रीय विद्यालयाची वेबसाइट https://kvsangathan.nic.in/ वर जाऊन आपण डिटेल पाहू शकता. असे प्रमोट होतील विद्यार्थी केंद्रीय विद्यालय संस्थेच्या जॉईंट कमिश्नर प्रिया ठाकुर यांनी यासंबंधीचे पत्र जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, जर कुणी विद्यार्थी या दोन इयत्तांमध्ये सर्व पाच विषयात जरी नापास झाला, तरी त्यास त्याच्या शाळेद्वारे प्रोजेक्ट वर्कच्या आधारावर तपासून गुण दिले जातील. यानंतर त्या गुणांच्या आधारावर त्या विद्यार्थ्यास पुढील इयत्तेमध्ये प्रमोटसुद्धा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी केंद्रीय विद्यालयाच्या वेबसाइटवर जावे.