चौफेर न्यूज – कोरोनामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता आणखी एक दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्वच शाळांना ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. यामुळे दिवसाचे काही तास विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र, सिलॅबस पूर्ण करणे अशक्य बनले आहे. यामुळे सीबीएसईने अभ्यासक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय असून त्यांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील काही मुलभूत बाबी वगळता 30 टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मंत्री रमेश पोखरीयाल यांनी जाहीर केला आहे.
दहावी, बारावी परीक्षा रद्द करण्यास सीबीएसईला कोर्टाचा ग्रीन सिग्नल कोरोना साथीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सीबीएसईला परवानगी दिली आहे. न्या. ए.एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने सीबीएसईला परीक्षा रद्द करण्यासाठी एक अधिसूचना जारी करण्यास परवानगी दिली. केंद्र आणि सीबीएसईकडून हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, मूल्यांकन योजना बोर्ड परीक्षांच्या गत तीन विषयांत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे असेल. आयसीएसई बोर्डाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्यांचीही सीबीएसईशी मिळतीजुळती योजना आहे. मात्र, यात सरासरी गुणांचा फॉर्म्युला वेगळा आहे.