चौफेर न्यूज – कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता खासगी शाळा जोपर्यंत उघडणार नाहीत, तोपर्यंत पालकांकडून फी मागू शकणार नाहीत. यासंदर्भातील घोषणा राजस्थानचे शिक्षण राज्यमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांनी केली. त्यानंतर शिक्षण विभागाचे उपसचिव अता उल्लाह यांनीही यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
शाळा सुरू होईपर्यंत खासगी शाळांनी पालकांवर फीसाठी दबाव आणू नये, असे या आदेशात नमूद केले आहे. तसेच, खाजगी शाळांकडून फी मागितल्याच्या तक्रारी आल्यास त्या शाळा संचालकांविरोधात त्वरित कारवाई केली जाईल, असे शिक्षण राज्यमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांनी म्हटले आहे. मात्र, शिक्षण विभागाकडे यासंदर्भात अद्याप एकाही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी शिक्षण विभागाने फी संकलन 30 जूनपर्यंत तहकूब करण्याचे आदेश दिले होते. परंतु याचा कार्यकाळ संपेपर्यंत बऱ्याच शाळा पालकांकडून फी घेण्यास दबाव आणत होत्या. त्यामुळे संकटात अडकलेल्या पालकांनी जोधपूर, जयपूरसह अनेक ठिकाणी खासगी शाळांसमोर निदर्शने केली होती. यानंतर सरकारने पालकांच्या समस्या समजून घेत हा आदेश जारी केला आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. बरेच लोक बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत ते खासगी शाळांमध्ये फी भरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे कोरोना काळात शाळांनी पालकांकडून फी घेऊ नये, असा निर्णय सरकारने घेतला आहे. खासगी शाळांसाठी पालकांकडून फी न घेणे निश्चितच एक आव्हान आहे, असे शिक्षण राज्यमंत्री गोविंदसिंह डोटासरा म्हणाले. तसेच, गावांमध्ये सुरू असलेल्या छोट्या शाळा वाचविणे ही देखील सरकारची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत भविष्यात त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही शिक्षण राज्यमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांनी सांगितले.