चौफेर न्यूज – विद्यापीठांनी अंतीम वर्ष वगळता इतर वर्षांचे निकाल लावण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये एटीकेटी किंवा बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारच्या नियमानुसार पुढच्या वर्गात प्रवेश दिला जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांना हा तात्पुरता दिलासा असून, पुढील १२० दिवसात परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.
‘कोरोना’मुळे राज्य सरकारने अंतीम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन व इतर वर्ष/सत्रात मिळालेल्या गुणांची सरासरी काढून पुढच्या वर्षात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गणितीय पद्धतीने सरासरी काढून निकाल लावण्यास सुरूवात केली आहे. सरकारने सर्वांना उत्तीर्ण करण्याचा आदेश दिल्याने त्यात बॅकलॉग असलेल्या विषयांमध्ये उत्तीर्ण केले जाणार असा समज अनेक विद्यार्थ्यांचा झाला आहे. मात्र, हा लाभ केवळ १२० दिवसांसाठीच आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, “राज्य शासनाने ८ मे रोजी जे आदेश दिले आहेत. त्यानुसार बॅकलॉगचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘एनए’ असा शेरा दिला आहे. कोरोनामुळे ही परिस्थिती उद्भवल्याने त्या पुरतातच हा निर्णय लागू होत आहे. त्यामुळे पुढील १२० दिवसात या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागेल
.कायद्यात तरतूद नाही विद्यापीठ कायद्यात बॅकलॉग च्या विषयांची परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे परीक्षा द्यावी लागणार आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पहाता, ती परीक्षा कशी घ्यायची यावर अद्याप शासनाकडून निर्णय झालेला नाही, त्यामुळे त्यांचे बॅकलॉग आहेत, त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवला पाहिजे, तरच त्यांना दिलासा मिळेल, असे पुणे विद्यापीठातील एका अधिष्ठातांनी सांगितले.
कायद्यानुसार पदवीच्या तृतीय वर्षात प्रवेश हवा असल्यास प्रथम वर्षातील सर्व विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षातील बॅकलॉग आहेत, त्यांना सरकारच्या आदेशाप्रमाणे तृतीया वर्षात प्रवेश दिला गेला आहे. पण त्यांनी प्रथम वर्षाचे राहिलेले विषय उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सध्या त्यांच्या गुणपत्रिकेवर “नॉट अप्लाइड” (एनए) असा शेरा दिला जात आहे.