चौफेर न्यूज – कोरोनामुळे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रांतील कामे ठप्प झाली आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मागासवर्गीय नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यातच या समाजातील विद्यार्थ्यांपुढे शैक्षणिक शुल्काचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी रिपाई आठवले गटातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे.
कोरोना विषाणूच्या संकटकाळातही शाळांचे संस्थाचालक विद्यार्थ्यांकडून चालू वर्षाच्या शैक्षणिक शुल्काची मागणी करीत आहेत. अनेकांची आर्थिक स्थिती नसतानाही शुल्कासाठी त्यांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येत आहेत. काही ठिकाणाहून शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून ऑनलाईन शिक्षणापासून अशा विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्यात येत असल्याच्याही तक्रारी येत आहेत, अशा संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही रिपाईतर्फे करण्यात आली आहे.