चौफेर न्यूज – कोरोना काळात JEE (main) आणि NEET-UG-2020 परीक्षा घेण्यावरुन सध्या केंद्र सरकारवर विद्यार्थी आणि पालक याशिवाय समाजाच्या विविध स्तरातून टीका होत आहे. दरम्यान, वारंवार विनंत्या करूनही परीक्षा ठरल्या वेळेतच होणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांकडून सतत दबाव असल्यानेच JEE आणि NEET परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा उलट दावा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे.
JEE आणि NEET परीक्षेसाठी परवानगी का देत नाही यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. विद्यार्थ्यांना काळजी लागली होती. आपण अजून किती काळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना सतावत होती, म्हणूनचं हा निर्णय घेण्यात आला’ असा दावा रमेश पोखरियाल यांनी केला. ‘जेईई परीक्षेसाठी साडे ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामधील ७ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केलं आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे,’ अशी ग्वाही रमेश पोखरियाल निशंक यांनी यावेळी दिली.
शाळा सुरु करण्यासंबंधी विचारण्यात आलं असताना गृह तसंच आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या आधारे हा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. दरम्यान जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणं अनिवार्य असल्याची माहिती रमेश पोखरियाल यांनी दिली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. जर एखाद्याचं शरीराचं तापमान जास्त असेल तर त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष ठेवण्यात आला आहे.