चौफेर न्यूज – राज्यातील 13 लाख 16 हजारांहून अधिक व्यक्ती कोरोनाबाधित झाले असून आता सर्वच जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. सद्यस्थितीत तीन लाख रुग्णांवर उपचार सुरु असून 35 हजारांपर्यंत रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत शाळा सुरु करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही. त्यामुळे यंदा शाळा सुरुच करायलाच नको, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कोरोनाची स्थिती सुधारल्यावरच टप्प्याटप्प्याने शाळा सुरु होतील,
ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यांत एकही रुग्ण सापडलेला नाही, त्याठिकाणच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनुसार शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले होते. अद्याप एकाही शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही, तथा कोणत्याही पालकाने संमतीपत्र दिलेले नाही. दरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, नाशिक, नगर, धुळे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्वीपासूनच सावध भूमिका घेतली आहे. भुगोलचा पेपर रद्द करण्यापासून ते अभ्यासक्रम कपात करेपर्यंत त्यांनी विद्यार्थीहिताचे निर्णय घेतले आहेत. आता विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच पहिले प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा कोणताही निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला नाही. मुलांची सुरक्षितता, त्यांचे आरोग्यच महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर त्यादृष्टीने नियोजन केले जाईल.
- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय नाहीच
- दिवाळीनंतर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याचा विचार
- ‘शाळा बंद अन् ऑनलाइन शिक्षण सुरु‘लाच राहणार प्राधान्य
- शाळा व्यवस्थापन समितीचे तोंडावर बोट; पालकांचीही नाही संमती
- राज्यातील 35 जिल्हे रेड झोनमध्ये; मृत्यू अन् रुग्ण वाढत असल्याची चिंता
- लस आल्यानंतर तथा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरु करण्याचा होईल निर्णय
- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, पूराची स्थिती; हिवाळ्यातही संसर्ग वाढीची भिती