चौफेर न्यूज – राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. ऑक्टोबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे कार्यक्रम कधी प्रक्षेपित केले जाणार?याबाबत लवकरच वेळापत्रक सुद्धा जाहीर केले जाईल, अशी माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.
राज्यात लवकरच अनलॉक ५ सुरु होणार आहे. मात्र अद्यापही राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्यालये कधी सुरु होणार याबाबत कोणतीही स्पष्टता राज्यसरकार कडून देण्यात आली नाही. दरम्यान, केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्यासाठी एसओपी (स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर कली. परंतु, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणं अवघड असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबत शिक्षण विभाग आणि संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिला होता. म्हणून आता शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं होतं.
तथापि, लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, 15 जूनपासून शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागही प्रयत्न करत होते. त्यासाठी मे-जून महिन्यापासून राज्याच्या शिक्षण विभागाकडून दूरदर्शनकडे वेळ मागण्यात आली होती. मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना याबाबत पत्र लिहून दूरदर्शनकडून वेळ मिळावी अशी विनंती केली होती.
याआधी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम सुरु केला. मात्र, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असा कोणताही शैक्षणिक कार्यक्रम नव्हता, त्यामुळे आता या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा मिळणार आहे. केंद्राने इयत्ता नववी ते बारावी शाळा 21 सप्टेंबर शाळा सुरु करण्याबाबत गाईडलाइन्स जाहीर केल्या असताना 21 सप्टेंबरपासून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार नसल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्यानंतर शाळा सुरु होईपर्यंत या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे. पहिल्या टप्यात इयत्ता नववी ते बारावी आणि त्यानंतर टप्याटप्याने इतर वर्गासाठी दूरदर्शनची वेळ घेऊन कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न आहे.