चौफेर न्यूज – गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांना २३ नोव्हेंबर रोजी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करुन सुरुवात करण्यात आली होती. परंतु इतर वर्गांना अद्यापही परवानगी नसल्याने प्राथमिक शाळा सुरु करण्यात आल्या नव्हत्या. मात्र राज्याच्या शिक्षण विभागाने ५ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू करण्यात आले आहे. परंतु ग्रामीणमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होत असले तरी शहरात मात्र महापालिका हद्दीतील ६ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत दिवाळीनंतर राज्यातील शाळा महाविद्यालय टप्प्याटप्प्याने उघडण्याचे आदेश काढले. तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. सुरुवातीला २३ नोव्हेंबरपासून ग्रामीणमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले. तर शहरात ४ जानेवारीपासून नववी आणि दहावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.
आजपासून ग्रामीण भागातील पाचवी ते आठवी आणि शहरातील सहावी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यापूर्वी सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर कोरोना तपासणी २५ जानेवारीपर्यंत अनिवार्य करण्यात आली होती. शिक्षक तपासणीचा अहवाल आणि दैनंदिन शाळेतील कामकाजाची माहिती शिक्षण विभागास २७ जानेवारी रोजी ऑनलाइन कळवण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या होत्या.