चौफेर न्यूज – मुंबई वगळता उर्वरित राज्यात आता ५ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. यानंतर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीने पाचवी ते आठवीचे वर्ग देखील सुरु केले आहेत. तर दुसरीकडं, महाविद्यालये मात्र अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत.
उच्च शिक्षणाचे महाविद्यालये नेमके कधी सुरु होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ‘राज्यातील विद्यापीठे-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात असून SOP ठरवून टप्याटप्याने महाविद्यालय सुरू करण्यात येईल,’ अशी माहिती उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
याआधी उदय सामंत यांनी 20 जानेवारीपर्यंत 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल असे सांगितले होते. मात्र अद्यापही त्यांनी निश्चित तारीख स्पष्ट केलेली नाही. कोरोना काळात अनेक महाविद्यालयांचे वसतिगृह विलगीकरणासाठी वापरण्यात आले होते.
त्यामुळे हे वसतिगृह पूर्वस्थितीत व निर्जंतुकीकरण करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून बाहेरील विद्यार्थ्यांना राहण्याची समस्या उद्भवणार नाही. जूनही काही वसतिगृह क्वॉरंटाईन सेंटर असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. ‘वसतिगृह सुरू करण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे. कारण अजूनही काही वसतिगृह क्वॉरंटाईन सेंटर आहेत. ते सुद्धा टप्याटप्याने सुरू केले जाणार आहेत. आता डिजास्टर मॅनेजमेन्टसोबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. या बैठकीनंतर महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. कॉलेज सुरू होण्याची तारीख 2 ते 4 दिवसात जाहीर करू,’ अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.