चौफेर न्यूज – मुंबई वगळता उर्वरित राज्यात आता ५ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. यानंतर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीने पाचवी ते आठवीचे वर्ग देखील सुरु केले आहेत. तर दुसरीकडं, महाविद्यालये मात्र अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत.
उच्च शिक्षणाचे महाविद्यालये नेमके कधी सुरु होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अखेर याबाबत भाष्य केलं आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती सामंतांनी दिली आहे. टप्प्या-टप्प्याने महाविद्यालये सुरु होणार असून ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे निर्बंध घालण्यात आले आहे.
विद्यापीठांना या संबंधात आदेश देण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर कॉलेज सुरु करण्यात येतील. दरम्यान, वसतिगृह पूर्वस्थितीत व निर्जंतुकीकरण करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून बाहेरील विद्यार्थ्यांना राहण्याची समस्या उद्भवणार नाही. फायर ऑडिट करण्याचे आदेश देखील देण्यात आले असून वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय कॉलेजवर सोपवण्यात आला आहे.
कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, यंदा हे निर्बंध नसणार आहेत. याबाबत उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. तसेच, यूजीसीच्या नियमांनुसारच कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे.