चौफेर न्यूज – देशात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
सध्या कोरोनाचं संकट भारतामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षी २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केला होता. देशातील सर्वच भागातील शाळा तेव्हापासून बंद होत्या. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी कोरोनावर प्रभावी ठरेल अशी सीरम इन्स्टिट्युटची लस बाजारात आली आणि आता लसीकरणाची मोहीमही सुरू झाली आहे.
दरम्यानच्या काळात कोरोना बाधितांचा वाढता आकडा घटल्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे सरकारच्या गोटात परत चिंतेचे वातावरण आहे. कोरोना काळात बंद असलेल्या शाळा देखील टप्प्याटप्प्याने उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार देशाच्या वेगवेगळ्या भागात शाळा सुरू होऊ लागल्या आहेत.
पण एकीकडे शाळा पूर्णपणे सुरू कराव्यात किंवा न कराव्यात, यावर महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे पंजाबमध्ये कोरोना काळानंतर शाळा सुरू होताच विद्यार्थ्यासोबत कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाला पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घावा लागला आहे.
पंजाबमध्ये जवळपास दहा महिने बंद राहिल्यानंतर ७ जानेवारीपासून शाळा सुरू झाल्या होत्या. तसेच, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिली आणि दुसरीचे वर्ग देखील सुरू करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये पंजाबमधील कोरोना बाधितांचा आलेख खाली आला असून सध्या पंजाबमध्ये ७ हजार ३५७ करोनाबाधित उरले असल्यामुळेच शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.