चौफेर न्यूज
– ‘इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. या परीक्षा घ्याव्याच लागणार आहेत,’ असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
तामीळनाडू सरकारने त्यांच्या राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही तसाच निर्णय घेतला जाऊ शकतो, अशा बातम्या पसरल्या होत्या. त्यावर या दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहेत. दोन्ही परीक्षा ऑफलाइनच घ्याव्या लागतील.
करोनाचे रुग्ण वाढत असताना भविष्यात काय परिस्थिती निर्माण होईल त्याला कसे सामोरे गेले पाहिजे याचा पाठपुरावा सुरू आहे. तामीळनाडूचा निर्णयही तपासून पाहत आहोत. पहिली ते आठवी, नववी आणि अकरावीचा काय निर्णय घेतला पाहिजे, याबाबत विविध यंत्रणांकडून मत मागवत आहोत, असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.
शिक्षणमंत्री म्हणाल्या…
– यापूर्वी पहिली ते आठवी तसेच नववी आणि अकरावीची परीक्षा झाली नव्हती. असाच निर्णय यंदाही घेण्याबाबत विचार करावा लागेल.
– दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात. या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आवश्यक आहे. ही मुले पुढे अकरावीला ऍडमिशन घेणार आहेत. बारावीची मुलं प्रोफेशनल कोर्ससाठी ऍडमिशन घेतील. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाच्या आहेत.





















