चौफेर न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या पदासाठी रविवारी (दि.२१) शहरातील एकूण ५९ केंद्रावर ही एमपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मास्क लागूनच परीक्षा द्यावी लागणार आहे.
आधीच कोरोनाचे संकट त्यात परीक्षा घ्यायच्या कशा? त्याचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न परीक्षा विभागाला पडला होता. त्यातच एमपीएससीची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन देखील केले होते. परंतु परीक्षा रद्द न करता त्या काही दिवसांसाठी पुढे ढकलल्या असल्याचे सरकारने स्पष्ट करून २१ मार्च ला परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एमपीएससीची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी एमपीएससी विभागाच्या वतीने परीक्षेचे नियोजन देखील करण्यात आले असून औरंगाबाद शहरात घेण्यात येणाºया परीक्षा केंद्रावर एकूण १९ हजार ६५६ उमेदवार परीक्षा देणार आहेत.
शहरातील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, होलिक्रॉस मराठी शाळा, होलिक्रॉस इंग्रजी माध्यमाची शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, बीड बायपास येथील एमआयटी महाविद्यालय, एन -४ येथील एमआयटी कॉलेज यासह आदी एकूण ५९ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात एमपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस कर्मचाºयांसह, केंद्रसंचालक आदी एकूण २ हजार १५६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
याशिवाय कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टसिंग ठेवून उमेदवारांना परीक्षा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना मास्क लावूनच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे एमपीएससीच्या परीक्षा विभागाच्या वतीने स्पष्ट केले आहे.