चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २५ एप्रिल रोजी घेण्यात येणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा शासनाने पुढे ढकलली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतल्याने यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो विद्यार्थी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेता आले नव्हते. अनेक शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेतले होते. त्यातच या परीक्षा पुढे ढकलल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे पालक वर्गातूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० मार्चपर्यंतची मुदत होती. मात्र,ही मुदत आता १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असल्याने अनेकांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहेत.