चौफेर न्यूज – दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि बारावीच्या परीक्षा होणार असे सांगण्यात आले. परंतु बारावीची परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार याबाबत राज्य सरकारने कोणतीही स्पष्टता अद्याप केलेले नाही. त्यामुळे बारावीच्या जवळपास १३ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास १२ लाख ७३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय १२ एप्रिल रोजी जाहीर होता. मात्र त्यानंतर राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षेबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय २० एप्रिल रोजी जाहीर केला. या निर्णयानुसार दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने १२ एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयात बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील, असे सांगतिले होते. मात्र, या परीक्षेबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. मात्र आता एप्रिल महिना संपत आला, असतानाही बारावीच्या परीक्षा कधी होणार, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा पद्धती याबाबत कोणतीही सूचना राज्य सरकार किंवा राज्य शिक्षण मंडळाकडून न आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही संभ्रमात पडले आहेत.
परीक्षेबाबत ठोस निर्णय हाती येत नसल्याने विद्यार्थ्यांचा ताण दिवसागणिक वाढत असल्याचे निरीक्षण पालक आणि शिक्षक नोंदवित आहेत. सध्या विद्यार्थ्यांचा अभ्यास, उजळणी अंतिम टप्प्यात आहे. असे असताना परीक्षेचे वेळापत्रक हाती असल्यास नियोजनबद्ध अभ्यास आणि अभ्यासातील सातत्य राखण्यास मदत होते. पण आता आणखी कितीवेळ परीक्षेची वाट पाहायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे.