चौफेर न्यूज – दहावीचा निकाल लागल्यानंतर आता १२ वीच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांदेखील तितकीच उत्सुकता आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सातत्याने राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालासाठी संकलित गुण भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेली संगणक प्रणालीच खंडित होत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी खूप वेळानंतर पुन्हा ती सुरू झाली. मात्र अजूनही त्यावरील काम हे वेगात होत नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून केल्या जात आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास १२ वीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. शिक्षकांकडून होत असलेल्या या तक्रारीमुळे शाळा, महाविद्यालयांना मंडळाकडे निकाल देण्यास उशीर होऊन मंडळाकडूनही निकाल जाहीर करण्यास विलंब होईल, अशी शक्यता शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ वीच्या विद्यार्थ्यांचे संकलित गुण संगणक प्रणालीत भरण्यासाठी महाविद्यालयांना २३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, सातत्याने होत असल्याने पावसामुळे शिक्षकांना गुण संगणक प्रणालीमध्ये भरण्यास अडचणी निर्माण होत आहे. १२ वी चा निकाल वेळेत लावता यावा यासाठी शिक्षक शाळा-महाविद्यालयांत हजर राहत आहेत, परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने त्यांना निकालाचे कोणतेही काम पूर्ण करता येत नसल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात बुधवारी सकाळी शिक्षकांनी शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त आणि राज्य मंडळाकडे याबाबत तक्रार केली. यानंतर त्यांनी दखल घेऊन ती सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अजूनही संगणक प्रणाली संथ गतीने सुरू असून सर्व्हर डाऊनमुळे गुण भरण्यास समस्या निर्माण होत आहे.
मुंबईत १२ वीचे साधारण तीन लाख विद्यार्थी असून त्यापैकी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्याचे गुण भरणे शिल्लक आहे; तर एक लाख विद्यार्थ्यांचे गुण अद्याप अंतिम झालेले नाहीत. राज्यातील सव्वातेरा लाख विद्यार्थ्यांपैकी सव्वापाच लाख विद्यार्थ्यांचे गुण भरणे बाकी असून पाच लाख विद्यार्थ्यांच्या गुणांचे अंतिम निश्चितीकरण बाकी असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेकडून देण्यात आली. तसेच पावसामुळे ही समस्या दोन दिवस कायम राहणार असून निकाल वेळेत न लागता विलंब होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.