चौफेर न्यूज – कोरोना विषाणू संसर्गामुळं लांबणीवर पडलेल्या पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षा आज आयोजित होत आहेत. पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अनेकदा लांबणीवर टाकण्यात आली होती. मुंबई वगळता राज्यभर परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यावर ठाम होती, अखेर आज परीक्षा पार पडत आहे. 6 लाख विद्यार्थ्यांसह प्रशासनाची देखील परीक्षा आज पार पडणार आहे. कारण, कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर मोठ्या स्वरुपातील पहिली शालेय परीक्षा आहे. परीक्षा देण्यासाठी शाळेत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.