चौफेर न्यूज – राज्यात गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ९ आणि १० ऑक्टोबर रोजी परीक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. या नैसर्गिक आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत, अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्रप्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येऊन प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देऊ न शकल्याची विविध कारणे सीईटी कक्षाकडे नोंदवले आहेत. विद्यार्थ्यांना कोरोना, अतिवृष्टी, डेंगू, मलेरिया, टायफाॅइड इ. साथीचे आजार, रोड दुर्घटनेमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचण, एकाच दिवशी दोन परीक्षा आणि इतर कारणे यामध्ये द्यायची आहेत.
पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या उमेदवारांना १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पात्र उमेदवारांना ई-मेल व एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क यापूर्वी भरले असल्यामुळे त्यांची नि:शुल्क नोंदणी करून घेण्यात येईल. नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्रे उपलब्ध करून देऊन ९ व १० ऑक्टोबर रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.