चौफेर न्यूज – राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच राहिल असं सांगतानाच राज्यातील शाळेबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा जशाच्या तशा सुरू राहतील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. शाळांबाबतही सरकार काय निर्णय घेणार असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी शाळांबाबत तूर्तासतरी सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरु आहेत, तशाच त्या सुरु राहितील, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मात्र चिमुकल्यांच्या लसीकरणाबाबत सरकारही प्रयत्नशील आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.
ओमिक्रॉनचाही संसर्ग वाढत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी भय नाही. पण काळजी घेतली पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही सण आणि नवीन वर्षाचं स्वागत निश्चित करा. पण निर्बंधाचंही पालन करा. राज्यात आधी 500 ते 600 रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या 1400 वर गेली आहे. त्यात ओमिक्रॉनचे रुग्णही 100च्या घरात गेले आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
ऑक्सिनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊन ठरवणार आहोत. ज्या दिवशी 800 मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रीक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नये. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं.
हॉटेल, उपहारगृहांसाठी जे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार ते सुरू राहतील. एकावेळी 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकं हॉटेलमध्ये राहू नये एवढा नियम पाळला गेला पाहिजे. तेवढीच अट आहे. हॉटेल बंद करण्याची अवश्यकता नाही, असंही त्यांनी सांगितलं.