हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेशातील आंज भोज परिसरात अंबोया गावात 1952 साली हे मंदिर बांधण्यात आले. ज्या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली, त्या दिवशी म्हणजेच त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून 3 दिवस या गावात यात्रा भरते. कोरोना संकटामुळं गेली 2 वर्ष ही यात्रा भरवण्यात आली नव्हती. यावर्षी मात्र प्रभात फेरीनं या यात्रेला सुरुवात करण्यात आली. 30 जानेवारी ही महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे.
गेल्या 7 दशकांपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ यात्रा भरवण्यात येते. या परिसरातील हजारो लोक मंदिरात जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जाऊन नतमस्तक होतात. 3 दिवस या परिसरात उत्साहाचं वातावरण असतं.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत राजपूर, टौरु, शिवा, भरली, भैला, रामनगर, क्लाथा, भंगानी, डांडा, पागर आणि सुनोग असे आजूबाजूच्या 20 गावांतील नागरिक सहभागी होतात. कधीकधी शेजारच्या राज्यातूनही अनेक जण या ठिकाणी येतात आणि महात्मा गांधींना श्रद्धापूर्वक नमस्कारही करतात.
अंबोया आणि परिसरातील नागरिक 30 जानेवारीला पहाटे मोठी प्रभातफेरी काढतात. त्यानंतर 1 फेब्रुवारीला कुस्तीच्या स्पर्धेनं या यात्रेचा समारोप करण्यात येतो.याशिवाय या यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. तीन दिवस परिसरात देशभक्तीचं वातावरण असतं. उत्तर भारतात हे महात्माजींचं एकमेव मंदिर आपल्या गावात असल्याचं इथल्या गावकऱ्यांना अप्रूप आहे. या गावाबद्दल सध्या खूप चर्चा आहे. लोकांना इथल्या उत्सवाचं खूप कौतुक आहे. सलग 70 वर्ष सुरु असणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उत्सवाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.