पिंपरी:- स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेड च्या वतीने किल्ले पुरंदर येथे रविवारी (दि.14 मे) रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकार नमूद केले आहे की, जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्काराने देखील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. या मध्ये प्रसिद्ध अभिनेता हास्य जत्रा फेम गौरव मोरे, लेखक केतन पुरी, अभिषेक कुंभार, पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या बरोबरच अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, पुणे शहर गुन्हे शाखा उपायुक्त अमोल झेंडे यांचा छत्रपती संभाजी महाराज विशेष गौरव सन्मान करण्यात येणार आहे. याबरोबरच उद्योजकांना स्टार्टअप साठी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये उद्योजक सतीश किंद्रे, युवा उद्योजक सागर पाटील, दीपक दिघे, रिजवान पानसरे, अक्षय जगताप, श्रीनाथ शेतकरी महिला स्वयं सहायता समूह यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, मिनाज मुल्ला, गट विकास अधिकारी अमर माने, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, पुरंदरचे तहसीलदार रूपाली सरनोबत, प्रभारी तहसीलदार दत्तात्रय गवारी आदींची विशेष उपस्थिती असणार आहे.
या सन्मान सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजित करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता पाळणा, साडेनऊ वाजता राजेंद्र कांबळे यांचा शाहीर जलशाचा कार्यक्रम, सकाळी दहा वाजता शस्त्रास्त्रे व शिवकालीन नाणी प्रदर्शन तसेच मर्दानी खेळ प्रात्यक्षिके, पावणे अकरा वाजता निलेश जगताप यांचे व्याख्यान, 11 वाजता मुख्य कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळा दुपारी 12 वाजता स्नेहभोजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे संयोजन अजय सिंह सावंत, संदीप जगताप, संतोष हगवणे, सागर जगताप आदींसह संभाजी ब्रिगेड पुरंदर शाखा तसेच महाराष्ट्र शासन आणि सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अजयसिंह सावंत आणि सतीश काळे यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे केले आहे.