प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन
साक्री:- प्रचिती इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यात मोलाची कामगिरी करणारे, स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतिकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे, कार्यक्रमाचे संयोजक तुषार सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पाहुण्यांच्या स्वागत सत्कारानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. इ.६वी. (ब) मधील प्रणाली देसले, इ.७ वी. मधील निलेश शेवाळे, इ.३ री मधील श्रेयान बदामे, इ.४थी. (ब) मधील कविश पवार व प्रज्ञा कोळी आणि इ.५वी.(अ) मधील निधी पाटील या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि साहित्य लेखन विषयक विचारांवर आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले. शाळेचे सहाय्यक शिक्षक प्रथमेश सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, भारत राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी त्यांचा जन्म झाला होता. महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांचे हे महान कार्य लक्षात घेता. त्यांनी पुणे जिल्ह्यात १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली. ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले आणि तिला देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला.
त्याचबरोबर महात्मा ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण सुद्धा केलेले आहे. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब अशा अनेक प्रकारच्या ग्रंथामधून त्यांनी समाजप्रबोधन केले होते. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना ध्येय गाठायचे असते. असे म्हणणाऱ्या ज्योतिबांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्या बरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. “सर्वसाक्षी जगत्पती! त्याला नकोच मध्यस्थी!!” हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
“भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही. जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन आहे.” नवीन विचार तर दररोज येतात. पण त्यांना सत्यात उतरविणे हाच तर खरा संघर्ष आहे. असे अनेक प्रगल्भ विचार त्यांनी मांडले असून आजही या विचारांचा सन्मान करून ते आचरणात आणल्यास अनेक गोष्टींनी काळाबरोबर आपण परिपक्व होऊ शकतो. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या विचारांचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि उंच शिखर गाठणे सोपे होईल, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुंदर सजावट फलक लेखन व रांगोळी रेखाटन मनोज भिल, जितेंद्र कासार, भूपेंद्र साळुंखे, दीपमाला अहिरराव, सविता लाडे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन तुषार सूर्यवंशी यांनी केले. सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, ड्रायव्हर बंधू यांच्या सहकार्याने थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आली.