प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा
साक्री: प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज, गुरुवार, १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते भारतमाता आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व ध्वजपूजन करून झाली. शाळेचे वरिष्ठ लिपिक बंदीश खैरनार यांनी ध्वजारोहण केले आणि उपस्थितांनी ध्वजास मानवंदना दिली.
शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे प्रेरणादायी गीत सादर केले आणि “महाराष्ट्र दिनाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर गुंजून गेला.
यानंतर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व विशद करताना राहुल पाटील म्हणाले की, “आजचा दिवस केवळ महाराष्ट्र दिन म्हणून नव्हे, तर जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी आणि न्याय्य वेतनासाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून देतो. १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी कामगारांनी मोठे आंदोलन केले आणि त्या आंदोलनाच्या स्मरणार्थ जगभरात हा दिवस साजरा केला जातो.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “१ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रदीर्घ आंदोलनात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले आणि म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रातील मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेची आठवण करून देतो.”
महाराष्ट्राच्या भूमीचे गौरव करताना राहुल पाटील म्हणाले, “प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश, हा थोर शूरवीरांच्या इतिहासाने भरलेला पावन देश आहे. ही भूमी संस्कृती आणि परंपरा जतन करणारी पवित्र भूमी आहे आणि येथे सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करण्याची महान परंपरा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “आजचा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव आहे. याच निमित्ताने ठिकठिकाणी सांस्कृतिक, शासकीय आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.” शेवटी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी सुंदर सजावट, आकर्षक फलक लेखन आणि सुंदर रांगोळी रेखाटण्याचे काम भूपेंद्र साळुंखे, सविता लाडे आणि दीपमाला अहिराव यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कुणाल पानपाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन सुनिता पाटील यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, शाळा समन्वयक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व ड्रायव्हर बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला.