फसवणूक करणाऱ्या भाजपाला नेस्तनाबूत करण्याची धनगर नेत्यांची शपथ
तळेगाव – धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने धनगर समाजाची सातत्याने फसवणूक केली आहे. समाजाच्या नेत्यांना सत्तेत घेण्याचे गाजर दाखवून त्यांच्या डोळ्यात धूळ फेकल्यामुळे संतापलेले धनगर नेते एकवटले असून आम्ही भाजप सरकारला नेस्तनाबूत करू, असा इशारा यशवंत सेना संघटनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी एका पत्रकाद्वारे दिला.
विधानसभा निवडणुकीत धनगर समाज कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, विद्यमान भाजप सरकारच्या स्वार्थी आणि घातक राजकारणामुळे धनगर समाज दुखावला गेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सरकारला नेस्तनाबूत करण्याची बिरोबा चरणी धनगर समाजाच्या नेत्यांनी शपथच घेतली आहे.
या पत्रकात गडदे म्हणाले की, भाजप-शिवसेना सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून फसवणूक केली. ६ महिन्यांपूर्वी १००० कोटींचे पॅकेज जाहीर करून समाजाच्या डोळ्यात धूळ फेकली. हे सरकार संविधान विरोधी आहे. धनगर समाजाची मते मिळवण्यासाठी २०१४ साली लोकसभा निवडणुकीत आणि आता विधान सभेला धनगर समाजाच्या नेत्यांना तिकीट देऊन बळीचा बकरा बनवीत आहे. तसेच धनगर समाजातील अण्णासाहेब डांगे, अनिल अण्णागोटे, प्रकाश शेंडगे, गणेश हाके, विठ्ठलमामा रबडे, नारायण आबा पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची धूळधाण उडविली आहे, असेही नमूद केले आहे. त्यामुळेच या निवडणुकीत धनगर समाज भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यास सज्ज झाला आहे, असे गडदे यांनी कळविले आहे.