पिंपरी : महायुतीच्या जागा वाटपात भोसरी मतदारसंघ भाजपला देण्यात आला. तेव्हापासून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात सक्रिय आहे. त्यामुळेच विरोधक काय म्हणतात याकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी खोट्या प्रचारापासून दूर रहावे. महायुतीचे उमेदवार आमदार लांडगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार सेनेने केला आहे, असे शिवसेनेच्या जिल्हा संघटीका सुलभा उबाळे यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पिंपरी येथे आयोजित या पत्रकार परिषदेस महापौर राहुल जाधव, भाजपचे नगरसेवक बाबू नायर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेनेचे कुणाल जगनाडे, सचिन सानप आदी उपस्थित होते.
सुलभा उबाळे म्हणाल्या की, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक प्रामाणिकपणे भोसरीत प्रचार करीत आहेत. मात्र, विरोधक अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पिंपरीतील सभेला महेश लांडगे अनुपस्थित होते. प्रचार साहित्यात सेनेचे झेंडे नसल्याबद्दल विचारले असता उबाळे म्हणाल्या की, महेश लांडगे हे प्रचारात असल्याने उद्धव ठाकरे यांच्या सभेला उशीरा पोहोचले, मात्र त्यांचे फोनवर बोलणे झाले, दोघांची भेटही झाली. लांडगे यांचे प्रचार साहित्य युती होण्यापूर्वी तयार होते. समन्वयासाठी बैठक झाल्यानंतर साहित्यात दुरुस्ती केली गेली. आम्ही सारेजण महेश लांडगे यांच्यासोबतच आहोत. तिकिट मिळविण्यासाठी सर्वांचे शर्तीथे प्रयत्न सुरु असतात, पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संघटनेची शिस्त पाळणारे आम्ही आहोत.
इरफान सय्यद म्हणाले की, आम्ही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते रोज प्रचारात एकत्र फिरतो. आमच्याबरोबर पदाधिकारी, समन्वयक असतात. हे तरी अफवा पसरवणारांनी लक्षात घेतले पाहिजे.
शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट म्हणाले की, शिवसेनेच्या भूमिकेबाबत सोशल मिडियावर जे काही आले त्या अफवा आहेत. भोसरीत मतदारसंघ भाजपला गेल्यापासून विरोधक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी लक्षात घ्यावे की, भोसरीत बंडखोरी झालेली नाही. अर्ज भरण्यापासून आम्ही महेश लांडगे यांच्या सोबत आहोत. शिवेसेनेच माजी खासदार व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा झाला. तेव्हाही सेनेने भूमिका स्पष्ट केली होती. सेना, भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झालेली आहे. त्यामुळे वादाचा प्रश्नच येत नाही. कार्यकर्त्यांनी चुकीच्या प्रचारापासून दूर रहावे, असे आवाहन आल्हाट यांनी केले.