रेडझोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनाही निश्चित यश येईल
पिंपरी : तत्कालीन राजकर्त्यांकडे असलेल्या दूरदृष्टीच्या अभावामुळे पिंपरी चिंचवडसाठी आंद्रा भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध करुन देण्याची योजना केवळ कागदावर राहिली होती. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे. शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना ठरेल. असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी येथे केले. रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार लांडगे यांनी तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासमवेत बैठका घेऊन प्रयत्न केले. हा प्रश्न सोडविण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना निश्चित यश मिळेल, असा विश्वास महापौर जाधव यांनी व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ त्रिवेणीनगर, तळवडे, रुपीनगर भागात कॉर्नरसभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महापौर जाधव बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, भाजप महिला आघाडीच्या पिंपरी चिंचवड अध्यक्षा शैला मोळक, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर, अरुणा भालेकर, गोपाळ भालेकर, शरद वसंत भालेकर, एस.डी. भालेकर व समस्त ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर जाधव म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर आहे. इतर शहराच्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्यावाढीचा दर दुप्पट आहे. भविष्यातील सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेता पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्या दृष्टीने भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावत या योजनेस गती देण्यात आली आहे. पस्तावित योजने नुसार मावळ आणि खेड तालुक्यातील या दोन धरणांमधून पिंपरी चिंचवडसाठी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला होता. मात्र, तत्कालीन राजकर्त्यांच्या उदासीनतेमुळे पुन:स्थापना खर्च भरण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना अनेक वर्षांपासून हक्काच्या पाण्यापासून वंचित व्हावे लागले होते. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे.
महापालिकेमार्फत शहराच्या चिखली, च-होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरात योग्य व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी नियोजित भामा आसखेड प्रकल्प राबविण्याची पक्रिया सुरु असल्याचे सांगून महापौर जाधव म्हणाले की, येत्या दिड वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भोसरी मतदार संघातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पहिल्या टप्प्यात शंभर एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्प, दुस-या टप्प्यात दोनशे एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. चिखली येथे 8 हेक्टर क्षेत्र जलशुध्दीकरण केद्रासाठी महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले असून सदर ठिकाणी तीनशे दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधणे प्रास्तावित आहे. या कामाचे संकल्प चित्र तयार करणे व सद्यस्थितीत शंभर दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणे व पुढील दहा वर्षांसाठी त्याचे संचालन व देखभाल दुरुस्तीच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. चिखली प्रभाग क्र. 1 येथे आंद्रा भामा आसखेड प्रकल्पांतर्गत शंभर दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केद्र उभारण्यासाठी 122 कोटी रुपये खर्च येणार आहे. या कामाचे भूमीपूजन 7 सप्टेंबरला करण्यात आले आहे. सन 2045 पर्यंतच्या लोकसंख्या वाढीचा विचार करुन नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात टॅकर मुक्त भोसरीचा संकल्प पूर्ण होणार असल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.
रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती महापौर जाधव यांनी यावेळी दिली. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार लांडगे यांच्या पाठिशी मतदारांनी आपली ताकद उभी करावी, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.