नाशिक – अवकाळी पावसाने राज्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा पिकाचे व तसेच रोपांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटली. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी कांद्याला घाऊक बाजारात 6 हजार उच्चांकी दर मिळाला. परंतु, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत सरासरी 1 हजार भावात घसरण झाली.
किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपये किलो कांदा असल्याने सर्वसामान्यांना कांदा रडवणार हे स्पष्ट आहे. लासलगाव, पिंपळगाव, चांदवड, देवळा, उमराणे, सटाणा या मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक कमी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 17 हजार हेक्टर कांद्याचे नुकसान झाले आहे. नवीन लागवडीसाठी केलेली रोपे देखील खराब झाल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.
कांद्याचा साठा असलेल्या शेतकऱ्यांना वाढलेल्या भावाचा फायदा होत असला तरी किरकोळ बाजारातील दर वाढत असल्याने सामान्य ग्राहक नाराज आहे. तर दुसरीकडे सरकार स्थापनेसाठी सतत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ठोस निर्णय होत नसल्याने कांदा दराचा मुद्दा सरकार, शेतकरी आणि सामान्य नागरिक तिघांच्याही दृष्टीने संवेदनशील बनणार आहे.