मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. याबाबत, दुपारी साडेबारा वाजता वायबी सेंटरमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, ‘राज्यपालांनी भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० तारीख दिली आहे. त्या दिवशी त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू करणार. राज्यात आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत. शिवसेनेकडेच सरकारचं नेतृत्व राहील, याची काळजी आम्ही घेऊ’, अशी आश्वासक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.. यावेळी अजित पवारांसोबत राज भवनावर गेलेल्या राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी देखील ‘आम्हाला या सगळ्याची काहीही कल्पना नव्हती’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटरवर दिली प्रतिक्रीया…
शनिवारी सकाळीच कुणाच्याही अपेक्षेच्या उलट देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण त्यासोबत सगळ्यात धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत येण्याच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या. त्यानंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवर ‘अजित पवारांच्या कृतीला माझा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला…
तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांना टार्गेट केलं. ‘या सगळ्यात शरद पवारांचा काहीही हात नाही, अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठित खंजीर खुपसला आहे. आता त्यांचं रस्त्यावर फिरणं कठीण होईल’, असं संजय राऊत यावेळी म्हणाले होते.